बलात्काराच्या घटनेने पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा लाजवले, शाळेतून घरी पतरणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार.

आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
सावदा (ता.रावेर)
         मागील आठवड्यात पुरोगामी महाराष्ट्रात बलात्काराच्या आठ घटनांनी होरपळून निघालेला असतानाच आज पुन्हा सावदा परिसरातील घटनेने त्या जखमा ताज्या झाल्या आहेत.
         याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीच्या मामाच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन,पीडित विद्यार्थिनीला मोटारसायकलीवर नेऊन संशयित  नराधमांनी आळीपाळीने   पाशवी लैंगिक  अत्याचार केला. सदर घटना सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच  पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती सावदा परीसरात झाली असून नराधमांना कायद्याचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान या घटनेतील तीघ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील पीडित बालिकेला घटनास्थळी सोडून पळ काढलेल्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जेरबंद केले आहे. या आरोपींना शनिवारी भुसावळ पोक्सो न्यायालयात हजर केले असता,दि.3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

        याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुन्हा 173/2024, भारतीय न्यायसंहिता कलम 70(2),75(1)(1),3(5) सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधि.2012 चे कलम – 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सावदा पो. स्टे.ला माहिती प्राप्त होताच तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला.
शक्ती विधेयक लागू होणे काळाची गरज.!
           डिसेंबर २०२१ साली महाराष्ट्र विधानसेभेने ‘शक्ती गुन्हेगारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२०’ हे एकमताने मंजूर केले. आंध्र प्रदेशच्या एपी दिशा कायदा, २०१९ च्या धर्तीवर अशा स्वरूपाचे विधेयक आणणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले होते. आंध्र प्रदेशमध्ये २६ वर्षीय तरुणीचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर दिशा कायदा करण्यात आला होता. या कायद्यात बलात्कार आणि सामूहिक बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती.
महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुरी दिली गेली. मात्र, अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे हे विधेयक लवकरात लवकर पारित व्हावे ही काळाची गरज आहे.

     पोलिसांनी घेतली वेळीच दखल:
             घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नखाते यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोस्टेचे स.पो.नि. विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत  अवघ्या 3 तासात एका अल्पवयीन व दोन संशयित अशा तीन आरोपीना ताब्यात घेतले.यातील 2 संशियीत आरोपी बंटी उर्फ आरिफ इस्माईल तडवी,बंटी उर्फ किरण भीमराव मेढे यांना पोक्सो न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दि. 3 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्यावतीने राजू तडवी यांनी बाजू मांडली.यातील एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.पुढील तपास स.पो.नि विशाल पाटील करत आहे. या आरोपींचा शोध लावण्यासाठी पीएसआय अमोल गर्जे , जयराम खोडपे,संजय तडवी यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

0/Post a Comment/Comments